महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणीही अपशब्द वापरले अख्खा महाराष्ट्र पेटून उठत असतो. दोन स्टॅन्ड अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ आणि सौरव घोष यांनी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख व वादग्रस्त व्यक्तव्य करीत नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र राग व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वत्र संतापाची लाट चालू असतानाच मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने एक पोस्ट केल्याने जनता तिला ट्रोल करीत आहेत. तिने फेसबुक द्वारे पोस्ट करताना असे लिहिले. “शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळत नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलासारखी बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यातून आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!”
पुढे तिने म्हटले, “सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात.”
पुढे बोलताना तीने म्हटले, “अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका.”
केतकी ने केलेल्या या पोस्ट वर अनेकांनी कमेंट्स मध्ये वाईट कमेंट्स केलेल्या दिसून येत आहेत. त्या स्टँड अप कॉमेडियन चा विरोध करण्याऐवजी उलट केतकी चितळे नव्या वादाला आमंत्रण देत आहे. अग्रीमा जोशुआ ने तर माफी मागितली परंतु आता केतकी ने पण माफी मागावी असे जनतेचे म्हणणे आहे.